पालकांनो पाल्याशी संवाद साधा..ज्यांच्या साठी कमावताय तीच खरी संपत्ती आयुष्याला संपवत असेल तर कमावलेली संपत्तीचे लोणचे घालणार आहात काय?
आष्टी सचिन रानडे-नुकत्याच गेल्या दोन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यात 24 तासांच्या अंतराने दोन शाळकरी अल्पवयीन मुलींनी आपले आयुष्य संपवले.ही बाब निच्छितपणे मनाला हेलावून टाकणारी आहे.न कळत्या वयात हे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल जर अशा मुली उचलत असतील तर खरंच पालकांनो आता तरी सावध व्हा.दिवसातून किमान अर्धा एक तास आपल्या पाल्याशी संवाद साधा.त्यांच्याशी हितगुज करा त्यांना समजून घ्या,तुम्ही त्यांना जवळ घेऊन चार गोष्टी त्यांच्या हिताच्या सांगा अन्यथा ज्यांच्या साठी दिवसरात्र एक करून जे काही कमावताय मात्र तीच खरी तुमची संपत्ती जर आयुष्याला संपवत असेल तर तुम्ही कमावलेल्या संपत्तीचे लोणचे घालणार आहात काय? असा प्रश्न आता माझ्यासारख्याला पडत आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली शिक्षणाच्या वाढता बाजार जरूर लक्षात घ्या. शिक्षणातील वाढती स्पर्धा देखील जरूर लक्षात घ्या.मात्र याच आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली वाढते ऑनलाइन शिक्षण त्यातून मोबाईलच्या विळख्यात अडकलेले आपले पाल्य आणि अभ्यासाच्या नावाखाली,क्लासेसच्या नावाखाली झालेली वेळेची अनियमितता आणि वेळी अवेळी पाल्य हाताळत असलेला तो मोबाईल खरंच एवढी शिक्षण घेणाऱ्या पाल्याची गरज बनलाय का? याचा देखील विचार होणे गरजेचे आहे.आपण पालक म्हणून स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याकडून नको त्या अपेक्षा नको त्या वयात ठेवतो याचा परिणाम म्हणून असंख्य विद्यार्थी आजघडीला तणावाचे जीवन जगत आहेत.पालक म्हणून आपण पाल्याला चांगली शाळा बघून देतो,त्याचा प्रवेश कसा होईल यावर भर देतो,त्याला लागणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्याची गरज भागवतो आणि हीच खरी आपली जबाबदारी म्हणून शिक्षणाचा सोपस्कार याच माध्यमातून पार पाडला जातो म्हणत आपापल्या उद्योगात गुंतून पडतो.पण कधी आपण असा विचार केला का,की आपण आपल्या पाल्याच्या प्रगती बाबत त्याला शिक्षणात येणाऱ्या अडीअडचणी बाबत,त्याला आवडणाऱ्या गोष्टी बाबत कधी त्याच्या सोबत आपला वेळ दिला का? हा प्रश्न आपण स्वतः आपल्या मनाला विचारायला पाहिजे. पालकांनो जरा मागे वळून पहा आणि आपल्या वेळेची शिक्षण पद्धती कशी होती,आपले आईवडील शिक्षकांना याला काही नाही आल तर तुम्ही त्याला परत परत सांगा,ऐकलं नाही तर वेगळ्या भाषेत सांगा,आणि जे काही असेल ते आम्हाला पण सांगा घरी आल्यावर आम्हीही त्यांच्याकडे पाहतो म्हणणारे आईवडील होते म्हणूनच तर आज आपण आहोत ना? हे तर मान्य आहेना.मग असाच विचार आपला पाल्य शिकत आहे त्यांच्यासाठी आपला वेळ देणं ही तितकेच गरजेचं आहे याचे भान आजच्या पालकांनी राखणे गरजेचे आहे.अन्यथा अशा घटना येणाऱ्या काळात आपल्या आसपास आणि कालांतराने आपल्या घरात घडल्या तर आश्चर्य वाटायला नको.
मी म्हणत नाही की वरील आत्महत्याच कारण मोबाईलचं असेल म्हणून मात्र एकंदरीतच कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात आलेला अँड्रॉइड फोन आणि त्यात मुलांनी अनावश्यक गोष्टींसाठी गुगल वरून केलेले सर्चींग हे काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल हाताळल्यानंतर लक्षात आले आहे.कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मोबाईल वापरल्यानंतर ते तपासणी साठी ज्यावेळी विद्यार्थ्यांकडून घेतले गेले त्या वेळी विद्यार्थ्यांनी सर्व सर्च केलेले क्रोमा वरून डिलीट केले खरे मात्र काहींच्या ईमेल वर गेल्यानंतर हिस्ट्री मध्ये सर्च केलेला डाटा तसाच राहतो हे काही क्षिक्षकांनी तपासल्यानंतर लक्षात आले आहे.
क्रमशः