योगामुळे निरोगी समाज घडेल;सक्षम भारताचे स्वप्न साकार होईल-आ.सुरेश धस
आष्टीत बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
click2ashti-योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली आहे. प्रत्येक भारतीयाने उत्तम आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करणे काळाची गरज आहे. योगामुळे समाज निरोगी होईल आणि निरोगी समाजातूनच सक्षम, सशक्त व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.

आष्टी शहरातील अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने रविवार (दि.२१)रोजी सकाळी ६ वा.आयोजित करण्यात आलेल्या बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत अनेक शारीरिक व मानसिक आजार वाढत आहेत.अशा परिस्थितीत योग हा आरोग्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.योगामुळे शरीर निरोगी राहते,मन प्रसन्न होते आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतो.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दररोज किमान काही वेळ योगासाठी द्यावा.योग हा भारताने जगाला दिलेला अनमोल वारसा असून आज संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला आहे,ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,नितीन मेहेर,राहुल मुथ्था,विनोद रोडे,इंजि.दत्तात्रय देशमुख,डॉ.नागेश करांडे,मुर्शदपूरचे सरपंच अशोक मुळे,नगरसेवक भारत मुरकुटे, किशोर झरेकर,दीपक निकाळजे,सूरज रोकडे,कपील अग्रवाल,रमेश कटके,बाबू कदम,संतोष रणसिंग,जेएमसीसी ग्रुपचेशितल मुथ्था,प्रितम बोगावत,शिवलाल कटारिया,पारस मेहेर,गणेश दळवी,प्रशांत कासवा,सचिन रानडे,अक्षय कासवा,श्रेयांश कासवा,अक्षय संचेती,विशाल कासवा यांच्यासह नागरिक,विद्यार्थी आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात योगगुरू योगेश सानप यांनी विविध योगासने,प्राणायाम आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले.उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे योगासनांचा सराव करत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.कार्यक्रमाच्या माध्यमातून “करू योग, राहू निरोग” हा संदेश देत नागरिकांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले.