ह.भ.प.इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा;सुप्रीम कोर्टाचा दणका
क्लिक2आष्टी अपडेट-प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता.दरम्यान,त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदोरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
इंदोरीकर महाराज यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शिर्डीतील ओझर येथे कीर्तनादरम्यान केलेल्या निरुपणात ‘सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनातील हे विधान म्हणजे समाजप्रबोधन अथवा सामान्य विधान नव्हे. तर ती चक्क गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा,अशी मागणी करण्यात आली होती.
काय आहेत आरोप ?
इंदोरीकर महाराज यांनी स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब,असे सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण,बिभीषण,कुंभकर्ण जन्माला आला.तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला असे म्हटल्याचे हे प्रकरण आहे.